Tuesday 31 January 2017

मख्ख थकवा आलाय विवेकाला

मख्ख थकवा आलाय विवेकाला..

सनसनाटी बनवलेल्या बातम्या,
सारख्याच प्रांजळपणाचा दावा करणारी
विरोधी नेत्यांची भाषणं,
विचारवंतांमधली मतमतांतरं,
दारिद्र्य रेषेच्या वर-खालची
व्यथित करणारी दृश्य..

या आणि अशा पुष्कळांनी
मख्ख थकवा आणलाय विवेकाला..

भीती वाटते अशा कुठल्याही विषयावर
मत मांडायची
अनाकलनीयतेच्या बोटाला
धाडस होत नाही
कुणाला साधं लाइक करण्याचं...

थकव्यापुढे दोन पर्याय आहेत-

डिप्रेशनच्या कोषात मिटून बसायचं
किंवा झिंग झिंग झिंगाटच्या
तालावर नाचणाऱ्यांची
मानसिकता आवडून घ्यायची
थिरकायचं बसल्याजागी...

आपल्या देशभक्तीचा पुरावा
मागायला कोणी येत नाही..
कोणी विचारत नाही
भारतीयत्वाची आपली व्याख्या..

पण त्या निमित्तानं विवेकाचं दार उघडलंच
तर बेंबीच्या देठापासून फुटतो टाहो
पण उमटत नाही आवाज क्षीणसाही
कपाळावर उठतात
जेमतेम चार दोन अठ्या...
त्यातून ना रक्त निथळते ना घाम..!

माहीत नाही, अशांना
जगण्याचा हक्क आहे की नाही..

पण थकवा आलेल्या देहाला आणि विवेकाला
प्रार्थनेवर विश्वास ठेवण्याची सूट घेऊन
सगळ्या निराश उद्वेगांवर
तिचं पांघरुण घालता येईल ना?
क्षणभर तरी हसेल ना
निर्मळ मनाच्या तलावातलं चांदणं?
***
आसावरी काकडे
३०.१.२०१७

No comments:

Post a Comment