Wednesday 1 May 2019

म्हणूनच..


कागद सहनशील असतात
आणि लेखणी आज्ञाधारक..
म्हणूनच
क्षणोक्षणी मनात धिंगाणा घालणारे
भावनांचे थैमान
विचारांचे काहूर
प्रश्नांचा गुंता
आणि कारण सापडत नसलेली
अस्वस्थता..
यांचे ओझे उतरवत राहते मी कागदावर
शब्दात साकारत जाते हे सारे
तसतशी मला मी सापडत राहाते..!

शब्दांना तर वरदानच असते
अखंड कौमार्याचे
कुणीही कितीही वापरले तरी
राहतात ते कोरे.. ताजे टवटवीत

म्हणूनच
अनाकलनीयतेच्या वादळात हरवायला होतं
कासावीस होतो जीव
त्या प्रत्येक वेळी मी साद घालते त्यांना
आणि ते धावून येतात होकायंत्र बनून..!
***
आसावरी काकडे
३०.४.२०१९