Thursday 28 July 2016

तरीही

किती जाळली लाकडे, पाहिले ना
किती थापल्या भाकरी, मोजले ना

कधीची अशी रांधते माय येथे
तरी पोट का रे कुणाचे भरेना..?

खरी भूक थोडेच मागे परंतू
मनातील हव्यास का आवरेना

समुद्रात येई नद्यांचेच पाणी
सराईत खारेपणा का सरेना?

रकाने भराया किती शब्द येती
दिलासा कुणाला तरी का मिळेना

किती जन्म येथेच झाले तरीही
जिवाला कुणी ओळखीचे दिसेना..!
***
आसावरी काकडे
28.7.2016
(साप्रेभ. दि. अंक २०१६)

सावली

केव्हातरी काढलेलं
माझं एक कृष्णधवल छायाचित्र-
खिडकीत बसलेली मी
चेहर्‍यावर अर्धा उजेड
अर्धी सावली..!

मनात आलं...
किती वर्षे झाली
मी अर्धीच वावरतेय सर्वत्र
सावलीतली अर्धी मी
अजून दिसलेच नाहिए कुणाला
माझंही कुठं लक्ष गेलं
आजवर तिच्याकडं..?

खरंतर
जन्मक्षणापासूनच
आपल्या सोबत असते
आपली सावली
पाहात असते जवळून
गळणार्‍या पानांसारखा
जगलेला एकेक क्षण...
बाहेर पडणारा एकेक निःश्वास
निर्माल्य बनत वाहून जाताना..

वजा होत जाणार्‍या
उजेडातल्या आपल्यावर
लक्ष ठेवून असते
हसत असते आपल्या
सुख-दुःखांना.. काळज्यांना..स्वप्नांना
बोलत नाही काही
मिसळत नाही आपल्यात
नुसती चालत राहाते सोबत..

पण वाटतं
कधीतरी अचानक
स्वतःतच सामावून घेईल ती
उजेडातल्या आपल्याला
कल्पनाही न देता
आणि
अदृश्य होईल निराकारात..!
***
आसावरी काकडे
२६ जुलै २०१६

Tuesday 26 July 2016

किती अजून आहे दूर

अब्जावधी वर्षांमधली
किती वर्षे जगून झाली

किती अंतर कापून झाले
किती अजून बाकी राहिले

किती अजून आहे देणे
चालू आहे आळवणे

गाणं मागतोय तो सूर
किती अजून आहे दूर

किती विटा झाल्या रचून
किती वेळा घेतले लिंपून

किती अजून बाकी भर
केव्हा होईल बांधून घर

अब्जावधी येथे जीव
अनंत काळ करतो कीव

प्रत्येकावर नाव तुझे
तरी चाले माझे माझे

***

आसावरी काकडे
२६ जुलै 2016

Thursday 21 July 2016

साद हिरव्याची पण..


साद हिरव्याची पण
मोह धरी आवरून
झाड शाळेला निघाले
हात छोटीचा धरून

शाळा दूर नाही फार
आहे आवारामधेच
आणि आवारही आहे
आखलेले बुंध्यातच

छोटी आपली आपण
शिकेलच हळू हळू
कसे तगायचे इथे
तिला लागेल आकळू

निश्वासून प्राणवायू
कसा शोषायचा रस
द्रव्य हरित पर्णांचे
कसे रखावे सकस

छोटी होईल तरुण
भय घावांचे झाडाला
पण तगायचा वसा
मुळातच कोरलेला

घाव पडलाच तर
खत जिवाचे करेल
आणि रुजून नव्याने
झाड पुन्हा बहरेल..!

***

आसावरी काकडे
२१ जुलै २०१६
(विवेक?)

Tuesday 19 July 2016

दुःख शहाणे असते

जेव्हा आतून बाहेरून
पोळत असते
दुःख वादळाच्या रूपात
वारा होऊन येते

आतली ज्योत थरथरू लागते
त्या झंझावातात
तेव्हा दुःख कंदिलाची काच
होऊन येते

सावध राहूनही
कडेलोट झालाच
तर दुःख बिछाना होते

मन काताऊ लागले
कुरकुरू लागले
तर दुःख मोठी रेष दाखवते

कधी ते भोगलेल्या सुखांची
किंमत वसूल करायला येते
तर कधी येणाऱ्या सुखांसाठी
पागडी मागायला येते

आधीच्या रेंगाळलेल्या भिडूला
खो द्यायला येते कधी
तर कधी रुचीपालट म्हणून
भेट द्यायला येते...

दु:ख शहाणे असते..
केवळ दु:ख नाही देत ते
प्रत्येक वेळी जाता जाता
थोडे शहाणपणही देते..!
***
आसावरी काकडे
१८.७.१६

Friday 15 July 2016

परस्परावलंबन..

सांगितले त्यांनी तोच असे कर्ता
आणि करविता घडे त्याचा

शब्दांचे प्रामाण्य मानून तयांनी
तोच ध्यानी मनी चिंतियेला

अखंड आकांत मांडला तरीही
साक्षात कुणीही आले नाही

कळून चुकले कुणी नाही देव
आहे सर्व ठाव रिता रिता

मग नाही त्याला देऊ केले नाव
साकारला देव भक्तीसाठी

देवाचे निर्माते झाले सर्व संत
अनंत कवेत कवळले

देव-भक्त नाते एकमेकावीण
राहील अपूर्ण असे झाले..!
***
आसावरी काकडे

१५ जुलै २०१६

पण कधी कधी..

दरवर्षी एक कुलूप लागते
बंद होत जाते तळघर

वर्षे गाडतात काय काय किती
कराया गणती वेळ कोणा?

साऱ्या गराड्यात जाते हरवून
वेडे मूलपण प्रत्येकाचे

पण कधी कधी होते अनावर
पडते बाहेर उफाळून

आणि मनमुक्त लागते हुंदडू
उडवीत चेंडू प्रौढत्वाचा..!

***
आसावरी काकडे
१४ जुलै २०१६

Wednesday 13 July 2016

दुःख म्हणावे दुःखाला

दुःख म्हणावे दुःखाला
आणि सुखालाच सूख
म्हणू नये तृप्त आहे
पोटी असताना भूक

येती प्रश्नातून प्रश्न
त्यांचा घालावा पसारा
गुंता सुटेना झाला की
जीव व्याकुळेल जरा

देह मन बुद्धी सारे
आधी पणाला लावावे
धाप लागेल इतके
प्रश्नांमगून धावावे

काही मिळणार नाही
झोळी रितीच राहील
उत्तरांचे मृगजळ
डोळ्यांतून पाझरेल

अशा निर्वाणीच्या क्षणी
स्वीकारावे निरुत्तर
अतृप्तीच्या पदरात
घ्यावा पार्थीव आहेर..!
***
आसावरी काकडे

१३ जुलै २०१६

हीच त्याची रीत

डोळ्यांच्या खिडक्या अशा सजलेल्या
आशा पालवल्या उत्सवाच्या

कोणता उत्सव प्रतीक्षा कोणाची
कोणत्या क्षणाची देहजाणे

परंतू दारांना कुलुपे किती ही
कुणीही कधीही येऊ नये

खिडक्या उघड्या दरवाजे बंद
आगळाच छंद अदृष्टाचा

असा महालात किंवा झोपडीत
हीच त्याची रीत सर्वांसाठी..!
***
आसावरी काकडे
१२ जुलै २०१६

Thursday 7 July 2016

काही नको म्हणताना

काही नको म्हणताना
काही हवेच असते
पळणार्‍या मेघांमध्ये
रूप मनीचे दिसते

बोट सोडले तरीही
स्पर्श उरतोच मागे
फूल-गळल्या देठात
रंग असतात जागे

वर वर मौन जरी
गुंते असतात पोटी
एका अटळ क्षणाला
नकळत येती ओठी

मुळे रोवून खोलात
झाडे उभी एका जागी
उदासीन मन तेथे
जाई बनून बैरागी

झाडे काही न करती
पण ठेवतात लक्ष
बुद्ध खाली बसला की
एक होते बोधीवृक्ष..!

***
आसावरी काकडे
७ जुलै २०१६

Wednesday 6 July 2016

तिजा कोण?

दोन जिवांची बाई मी
ओझे पेलवेना झाले
एक रमतो इथेच
चित्त दुजाचे उडाले

एक खेचतोय पाय
दुजा म्हणे आता पुरे
एक निरोपाला सज्ज
दुजा थंडीला घाबरे

दोन जिवांची अशी ही
ओढाताण सोसतेय
कधी ऐकते एकाचे
कधी थकून जातेय

कळेनासे झाले आहे
देहातले हे त्रिकुट
दोन जीव, तिजा कोण?
एक सनातन कूट..!

***

आसावरी काकडे
६ .७ .२०१६