Friday 5 August 2016

ती एक अनाम भिल्लिण

ती एक अनाम भिल्लिण
आपल्या पाच तरुण मुलांसह
लाक्षागृहात जळालेली..!

त्यांचा अपराध नव्हताच काही
त्यांना केलेली शिक्षाही नव्हती ती
एका कटाला काटशह देण्यासाठी
आखलेली केवळ एक योजना होती..!

दूर्योधनाला आगीत होरपळलेले
सहा देह दिसले
आणि पाची पांडव कुंतीसह सुखरूप निसटले
पुढे मोठे महाभारत घडले...
वर्षानुवर्षे त्याचे गोडवे गायले गेले..!

कुणाला कळलंही नाही की
त्यासाठी एका निरपराध कुटुंबाचा बळी गेला...
क्रौर्य असं घरंदाज की
अत्याचाराचा मागमूसही लागला नाही कुणाला
आजतागायत...!

किती कथांमधल्या किती फटी
अशा बेमालूम बुजवल्या असतील कथाकारांनी
ज्यात कित्येक स्त्रिया.. आदिवासी
गाडले.. चिरडले.. होरपळले असतील..!
***
आसावरी काकडे
३.८.२०१६

No comments:

Post a Comment