Wednesday 13 July 2016

दुःख म्हणावे दुःखाला

दुःख म्हणावे दुःखाला
आणि सुखालाच सूख
म्हणू नये तृप्त आहे
पोटी असताना भूक

येती प्रश्नातून प्रश्न
त्यांचा घालावा पसारा
गुंता सुटेना झाला की
जीव व्याकुळेल जरा

देह मन बुद्धी सारे
आधी पणाला लावावे
धाप लागेल इतके
प्रश्नांमगून धावावे

काही मिळणार नाही
झोळी रितीच राहील
उत्तरांचे मृगजळ
डोळ्यांतून पाझरेल

अशा निर्वाणीच्या क्षणी
स्वीकारावे निरुत्तर
अतृप्तीच्या पदरात
घ्यावा पार्थीव आहेर..!
***
आसावरी काकडे

१३ जुलै २०१६

No comments:

Post a Comment