Thursday 7 July 2016

काही नको म्हणताना

काही नको म्हणताना
काही हवेच असते
पळणार्‍या मेघांमध्ये
रूप मनीचे दिसते

बोट सोडले तरीही
स्पर्श उरतोच मागे
फूल-गळल्या देठात
रंग असतात जागे

वर वर मौन जरी
गुंते असतात पोटी
एका अटळ क्षणाला
नकळत येती ओठी

मुळे रोवून खोलात
झाडे उभी एका जागी
उदासीन मन तेथे
जाई बनून बैरागी

झाडे काही न करती
पण ठेवतात लक्ष
बुद्ध खाली बसला की
एक होते बोधीवृक्ष..!

***
आसावरी काकडे
७ जुलै २०१६

1 comment: