Thursday 28 July 2016

तरीही

किती जाळली लाकडे, पाहिले ना
किती थापल्या भाकरी, मोजले ना

कधीची अशी रांधते माय येथे
तरी पोट का रे कुणाचे भरेना..?

खरी भूक थोडेच मागे परंतू
मनातील हव्यास का आवरेना

समुद्रात येई नद्यांचेच पाणी
सराईत खारेपणा का सरेना?

रकाने भराया किती शब्द येती
दिलासा कुणाला तरी का मिळेना

किती जन्म येथेच झाले तरीही
जिवाला कुणी ओळखीचे दिसेना..!
***
आसावरी काकडे
28.7.2016
(साप्रेभ. दि. अंक २०१६)

No comments:

Post a Comment