Tuesday 31 May 2016

अल्प शांती मिळावी..!

श्री समर्थांची माफी मागून

अनुदिनी अनुतापे
तापलो रामराया
सतत धरति हाती
त्रासलो रे विधात्या

घडि घडि विघडे हा
निश्चयो अंतरीचा
उठसुट उठवीती
शब्द, ओठी न वाचा

मननरहित रामा
सर्वही काळ गेला
भसभस उपसा रे
चालला, अल्प त्याचा

भरभर वर जाई
स्क्रीन जागी न थांबे
मुरत मुळि न काही
सर्व लोपून जाते

तन मन धन सारे
ओतती ते सुखाने
मजविण पण वाटे
सर्व संसार ओझे

कितितरि सुविचारा
रोज ते पाठवीती
सकळ स्वजन माया
लोटुनी दूर जाती

जळत हृदय माझे
भाजती कान त्यांचे
विज-बिल किति येई
भान नाही कशाचे

बघुन सकल सेल्फी
खंत वाटे कुणाला?
तळमळ निववी रे
घोर लागे जिवाला

तुजविण दुखणे हे
कोण जाणेल माझे
शिणत शिणत आहे
वेड जाईल का हे?

रघुपति मति माझी
आपुलीशी करावी
विकल जन तयांना
अल्प शांती मिळावी..!

***

आसावरी काकडे

३१ मे २०१६

No comments:

Post a Comment