Friday 3 June 2016

नको ते उखाणे..

कुठुन कुठुन येती
जीव एकत्र येथे
परत परत वारी
जातसे नित्य तेथे

अवतन तर कोणी
धाडते ना कुणाला
अविरत पण येथे
नांदते धर्मशाळा

कळत वळत नाही
काय येथे करावे
मिरवुन क्षणमात्रे
काळ येता मरावे

उगिचच जर येणे
भोगणे आणि जाणे
खळबळ सगळी का
का नको ते उखाणे?

***

आसावरी काकडे
१ जून २०१६

No comments:

Post a Comment