Friday 3 June 2016

म्हणून घडलं एवढं सगळं..!?

तिला माहीत नाही
कुणाच्या चोचीतून पडलं बी
उडता उडता..
तिनं विचारलं नाही नाव गाव
सहज सामावून घेतलं उदरात
इकडून तिकडून पाणी आलं
ऊन.. वारा.. आणि सर्वसाक्षी आकाशही
तरारली कर्दळ
इमारतीच्या आडोशाला
रानही उगवत राहिलं
तिला बिलगून...

त्याला माहीत नाही
ही कशाची फांदी.. कोणती पानं..फुलं..
उघड्यावरच बहरलेल्या
त्या झुडुपात
त्यानं शोधला आडोसा
पानांच्या आत आत जाऊन
निवांत घासत राहिला इवले पंख
इवल्या चोचीनं
तिथल्या तिथंच उडून पाहिलं जरासं
आणि किलबिलत उडून गेला..!

एका पक्षाला
क्षणभर आडोसा मिळावा
म्हणून घडलं
एवढं सगळं..!?

***


आसावरी काकडे 
१ जून २०१६

No comments:

Post a Comment