Thursday 2 August 2018

म्हटले होते

आषाढ संपता त्याने  रिमझिमेन म्हटले होते
आल्यावर श्रावण मीही गुणगुणेन म्हटले होते

पण मेघ होउनी कविता वाकुल्या दाउनी गेली
स्वप्नात तिनेही रात्री बोलवेन म्हटले होते..!

सूर्यास्त होउदे मित्रा येउदे तमाचा फेरा
पणतीने विश्वासाने मिणमिणेन म्हटले होते

विश्वास हरवला तेव्हा ती पुन्हा उफाळुन आली
प्रत्येक अशा वेळी मी मोहरेन म्हटले होते

आधार नका रे देऊ सारखा दीन दुबळ्यांना
त्यांच्यातच बळ जगण्याचे चेतवेन म्हटले होते

भरधाव निघाला रस्ता अन दरी खोल सामोरी
पण सावध राहुन त्याने मी वळेन म्हटले होते..!
**
आसावरी काकडे
१.८.२०१८

3 comments: